विद्युत तारेच्या धक्याने युवकाचा मृत्यू,पाणीटंचाईचा पहिला बळी
चाकूर तालुक्यातील वडवळ नागनाथ येथील घटना
संपादक:सुनिल जाधव सेवा न्यूज लातुर मो-9766553995
वडवळ नागनाथ, दि.१६ – पाण्याच्या टँकर मध्ये शिल्लक पाणी पाहायला गेला असता विद्युत तारेचा स्पर्श होऊन येथील युवकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी (दि.१६) रोजी सकाळी घडली.
वडवळ नागनाथ येथे तीव्र पाणीटंचाई जाणवत असल्याने विविध वार्डामध्ये पाणी वाटपासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने पाण्याचे टँकर फिरवले जात आहेत.मंगळवारी सकाळी येथील बौद्ध वस्तीमध्ये पाण्याच्या टँकरने पाणी वाटप करत असताना येथील युवक श्रावण बालाजी मस्के (वय वर्षे-२७) हा टँकर मध्ये शिल्लक असलेले पाणी पाहण्यासाठी टँकरवर चढला असता महावितरणच्या विद्युत तारेचा स्पर्श झाल्याने शॉक लागून युवक गंभीर जखमी झाला. दरम्यान जखमी युवकास लातूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेत असताना युवकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.
या प्रकरणी पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.यामुळे वडवळ नागनाथ गावावर शोककळा पसरली आहे.
दरम्यान,श्रावणची उत्तरिय तपासणी केल्यानंतर मंगळवारी सायंकाळी त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात आई -वडील, भाऊ, बहिण असा परिवार आहे.