अरेरेरे..पंचायत समितीमध्येच नाही तर ग्रामपंचायतीच्या गावाला पाणी मिळणार कधी..?
चाकूरच्या पंचायत समितीत कर्मचारी सत्त्तर अन कार्यालयात दरवळतो मुताचे अत्तर.

चाकूरच्या पंचायत समितीत पिण्याच्या पाण्याचा व स्वच्छतागृहांचा गंभीर प्रश्न..!
मुख्य संपादक-सुनिल जाधव सेवा न्यूज मो.9766553995
चाकूर तालुक्यातील मुख्य प्रशासकीय केंद्र मानल्या जाणाऱ्या चाकूर पंचायत समितीमध्ये सध्या पिण्यासाठी पाणी उपलब्ध नसल्याने कर्मचारी,अधिकारी तसेच आम नागरिकांना प्रचंड गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे.जसे की आडातच नाही तर पोवऱ्यात कुठून येणार असे येथील पाण्याची दुरावस्था बघून सांगता येईल. शौचालय व मुतारींमध्ये पाणी नसल्याने ती ठिकाणे अस्वच्छ झाली असून उग्र वासामुळे नागरिक व कर्मचाऱ्यांना याचा त्रास अधिक वाढला आहे.
प्रशासनाचे दुर्लक्ष
पंचायत समिती कार्यालयात रोज शेकडो नागरिक विविध शासकीय कामांसाठी भेट देतात.मात्र तेथे स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध नसल्याने लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकती करावी लागत आहे.शौचालय व मुतारींमध्ये पाणी नसल्यामुळे घाण साचून राहिली आहे.या दुर्गंधीमुळे कामकाजाच्या वातावरणावर परिणाम होत असून महिला कर्मचारी व नागरिक यांना विशेष त्रास सहन करावा लागत आहे.
आरोग्य धोक्यात
उग्र वास,अस्वच्छता व पाणी टंचाईमुळे संसर्गजन्य रोगाचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.स्वच्छ भारत अभियान, जलसंधारण यासारख्या योजनांचा गाजावाजा करणाऱ्या यंत्रणेकडूनच पिण्याचे पाणी व स्वच्छतागृह याकडे दुर्लक्ष होत असल्याची चर्चा पंचायत समिती येथे येणाऱ्या नागरिकांतून केली जात आहे.
नागरिकांचा संताप
कार्यालयात आलेल्या काही नागरिकांनी सांगितले की,“आम्हाला कामांसाठी जवळपास दोन ते तीन तास थांबावे लागते.पण पिण्यासाठी स्वच्छ पाणी मिळत नाही आणि शौचालय वापर करावे म्हटले तर तेथे जाणं अशक्य झालंय.अशा परिस्थितीत प्रशासनानेतातडीने उपाययोजना करायला हवी.”
आम नागरिकांची तातडीची मागणी
सध्या कर्मचारी व नागरिकांच्या आरोग्याशी निगडीत प्रश्न निर्माण झाला असून पंचायत समिती प्रशासनाने तातडीने पाणी उपलब्ध करुन स्वच्छतागृहांची स्वच्छता करावी,अशी मागणी होत आहे.अन्यथा नागरिक व कर्मचारी मिळून आंदोलन छेडण्याचाइशारा दिला जात आहे.